Tuesday 22 October 2013

पु.लं. आणि थ्री इडियटस


पु.लं. आणि थ्री इडियटस

परवा पुलंचे ‘बिगरी ते matric ” ऐकत होते. हात कामात होते, पण मन मात्र पुलंच्या शब्दात रंगले होते. मला माझ्या बालपणात घेऊन जात होते. अगदी हसत हसत, विनोदाच्या माध्यमातून पुलंनी मांडलेला विचार, प्रश्न आजच्या काळाशीही किती निगडीत आहे, हे जाणवले. इतिहासासारखा मनोरंजक विषय पण शाळेमध्ये सनावळ्यात, तहाच्या कलमात कसा हरवून जायचा ते आठवले. आज उत्साहाने गुगलवर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणचे नकाशे पाहणारी मी, शाळेत मात्र भूगोलाला घाबरायचे. कारण कोणत्या ठिकाणी कोणते पीक येते, कोणती खनिजे आहेत हे मला जाम लक्षात राहायचे नाही. पुलंच्या लेखातल्या शेवटच्या ओळीही मनावर आघात करून गेल्या. “आमचं बालपण करपून गेलं” हे हसत सांगणारे पुलं स्वतःची व्यथाच सांगून गेले.

या शिकलेल्या विषयांची पुढच्या आयुष्यात कशी जरुरी पडली नाही, हे ऐकताना मला एकदम ‘शिक्षणाच्या आयचा घो’ मधला लाचार बाप आठवला. “शिल्पकला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गणितात पास होण्याची सक्ती कशाला” असे तळमळीने मुख्यमंत्र्यांना विचारणारा! मुलाच्या चांगल्यासाठीच पण शिस्त लावण्याच्या नादात त्याच्या मनावर आणि शरीरावरही आघात करणारा!

मार्क, अडमिशन, नोकरी – या चक्रात अडकलेली आपण सारी! मुलांना काय आवडतं, त्यांना कशात गती आहे, हे आपल्या ध्यानातही नसते. आठवी आली की मुले आणि पालक शिकवण्या, प्रवेश परीक्षांच्या बुद्धिबळात गुरफटून जातात. या शिक्षण पद्धतीत आपण सारीच प्यादी बनलेलो आहोत. कारण आज ‘यश’ ‘सुख’ या संकल्पनाही शिक्षण, नोकरी, पगार यांच्याशीच जोडल्या गेल्या आहेत. या गदारोळात मग एखादी चांगली गाणारी मुलगी वा मुलगा, एखादा लेखनाची आवड असणारा मुलगा किंवा एखादा चित्रकलेत गती असणारा विद्यार्थी हा आपली कलाही नाकारू शकतो, कारण या कलागुणांना काहीही “किंमत” नाही हेच त्यांच्या सतत कानी कपाळी सांगितले जाते.

‘कॅनव्हास’ नावाच्या एका मराठी सिनेमात एक चित्रकार, आपल्या शिक्षक वडिलांच्या आवडत्या विद्यार्थ्यांना ठार मारतो. कारण वडिलांनी सतत त्याचा पाणउतारा केलेला असतो. आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळवूनही वडिलांना त्यांचे डॉक्टर, इंजिनियर झालेले विद्यार्थीच प्रिय असतात.
आपल्या शिक्षण पद्धतीत आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य नाही. गणितात हुशार असलेल्या मुलाला, गती नसली तरी भाषेत वा इतिहासात भरपूर मार्क मिळवण्याची सक्ती आपली ही पद्धती करते. सर्व विषय आलेच पाहिजेत या विचारांमुळे नावडते विषयही मुलांना शिकावेच लागतात. याचाही मुलांवर ताण पडतोच.

तुम्ही भारतातून परदेशात शिकायला गेलेल्या मुलांचे लेख कधी वाचलेत? त्यात पहिल्याच परिच्छेदात लिहिलेले असते की, “तिथे न आपण आपले विषय निवडू शकतो”. याचाच आनंद मुलांना इतका होतो, की मग तो त्यांच्या साऱ्या शिक्षणावरच नव्हे, तर व्यक्तिमत्वावरही परिणाम करतो. स्वतः निवडलेले विषय मग अधिक आवडीने, जबाबदारीने, मन लावून अभ्यासले जातात.
चेतन भगत यांच्या ‘five point someone’ मध्ये हीच व्यथा मांडली आहे. “I.I.T.” सारख्या संस्थेतही फक्त मार्कांना महत्व आहे. येथेही नव्या विचारांना, कल्पनांना स्थान नाही.

3 idiots मधला रान्चो म्हणतो, “काबिल बनने के लिये पढो. फिर कामयाबी तुम्हारे पिछे भागेगी” . पण आजही चित्र बदललेले नाही. आयुष्याला अर्थ देणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या भाषा, इतिहास, समाजशास्त्र, चित्रकला, शिल्पकला, नाट्यकला, साहित्य – या विषयांना “option” ला टाकले जाते. हे विषय घेऊनही करीयर करता येते याची अनेकांना जाणीवही नाही. किंवा असली तरी यातून पैसा मिळणार नाही हेच मनावर ठसवले जाते.
‘पुलं’ पासून ‘चेतन भगत’ पर्यंत सगळ्यांना या एकांगी शिक्षण पद्धतीची सल जाणवते. पण ती दूर कशी करायची हा प्रश्न आहे. तिथपर्यंत आपली मुले अशीच “well trained” राहणार “well educated” होणार नाहीत!

No comments:

Post a Comment

Share your views also ---