Wednesday 11 May 2016

साहिर !!!!


पोछ्कर अश्क अपनी आंखोसे, मुस्कुराओ, तो कोई बात बने,
सर झुकानेसे कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने,

"नया रास्ता" या नावाचा एक सिनेमा ४०/४५ वर्षांपूर्वी आला होता. या सिनेमातील हे गाणे ! अगदी नकळत्या वयात कानांवर पडलेले ! पण त्या वेळीही मनाला भिडलेले !

रंग और भेद जात और मझहब, जो भी हो आदमी से कमतर हैं
इस हकीक़त को तुम भी मेरी तरह मान जाओ तो कोई बात बने,

या गाण्यातून कवीला चांगला संदेश, वेगळा संदेश द्यायचा आहे एवढे मला तेव्हा ही कळले.
गाणे आवडले की लिहून ठेवायची माझ्या आईची सवय होती. सुरुवातीला अनुकरण म्हणून केलेला हा उद्योग मला पुढे खूप समृद्ध करून गेला. अशीच आवडलेली गाणी लिहिता लिहिता, मी त्याखाली कवी, संगीतकार, गायक आणि सिनेमाचे नाव ही लिहू लागले. आणि या आवडलेल्या गाण्यांत साहिरचे नाव वारंवार येऊ लागले. या गीतकाराची जातकुळी वेगळीच आहे हे जाणवू लागले.

"नया रास्ता" मधील या गाण्यातही एका भेदाभेदरहित समाजाची कल्पना कवी करत आहे. वास्तव मान्य करणे महत्वाचे आहे तरच आपण ते बदलू शकतो. हक्क मागून मिळत नसतो, तो कधी कधी हिसकावूनही घ्यावा लागतो. तेवढी हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल असे सांगणारी ही कविता !!!!! विचार करायला लावणारी गाणी ही साहिरची खासियत !

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भ्रमनिरास झालेल्या तरुण वर्गाचे दर्शन त्याच्या "प्यासा" मधील कवितांतून दिसते.
जिन्हे नाझ हैं हिंदपर वो कहां हैं?
ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या हैं?

पैशाला पुजणार्या जगात तो एकटा पडतो.
जाने वो कैसे लोग थे, जिनके प्यार को प्यार मिला
असा प्रश्न त्याला पडतो.

साहिर हा साम्यवादी विचारसरणीचा होता. या त्याच्या विचारांचे दर्शन त्याने लिहिलेल्या गाण्यातूनही घडते. "फिर सुबह होगी" या चित्रपटातील त्याचे "वो सुबह कभी तो आयेगी" हे गाणे आठवते ना? नवे जग निश्चित येईल अशी आशा त्याला होती. "नया दौर" या सिनेमातील "साथी हाथ बढाना" हे गाणे नव्या जगाची दिशा दाखवते. त्याचा आशावाद अगदी साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करते.

आशावाद जागवणारा साहिर कधी कधी मात्र नैराश्येच्या गर्तेत जातो.
जाये तो जाये कहाँ, समझेगा कौन यहाँ, दर्दभरे दिल की जुबाँ
असे व्याकुळतेने विचारतो.

अशा निराशावादी साहिरनेच -
आगे भी जानेना तू, पिछे भी जानेना तू, जो भी हैं बस यहीं एक पल हैं
असे आशावादी गीत ही  लिहिले आहे.

रात जितनी भी संगीन होगी, सुबह उतनीही रंगीन होगी - असा धीर ही दिला आहे.

प्यार पर बस तो नहीं हैं मेरा, लेकीन फिर भी,
तू बता दे के तुझे प्यार करूं, या ना करूं,
प्रेयसीला विचारून, तिच्यावर प्रेम करणारा हा कोमल हृदयाचा प्रियकर ! आजच्या काळात मैत्रिणीने 'नाही' म्हटल्यावर तिला भोसकणारा, तिचा खून करणारा प्रियकर - या पार्श्वभूमीवर साहिरचे हे हळवेपण उठून दिसते.

काही गाण्यांत त्याची मते इतक्या परखडपणे व्यक्त होतात की अंगावर काटा येतो. "साधना" सिनेमातले "औरत ने जनम दिया मर्दों को" हे असेच एक गाणे ! समाजाचे किळसवाणे रूप कठोरपणे साहिर समाजासमोर आणतो.
मर्दों ने बनाई जो रस्में, उनको हक़ का फर्मान कहा,
औरत के जिंदा जलने को, क़ुर्बानी और बलिदान कहा,
इस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा
ये वो बदकिस्मत माँ हैं जो, बेटों की सेज पे सोती हैं

पुरुषांनाच काय पण स्त्रियांनाही त्यांच्या जगण्याची जाणीव करून देणारे हे काव्य !

ही कविता मी ऐकली आणि अंतर्बाह्य हादरून गेले. एका पुरुषाने जाणलेले स्त्रियांचे दुःख, त्यांच्या अस्तित्वाची वेदना याहून प्रखरपणे व्यक्त होऊच शकत नाही.

साहिर हा अशा अनेक रुपांत भेटत रहातो. मलाच काय पण अनेकांना आयुष्य समजावत रहातो. धर्माविषयीही त्याची परखड मते होती. "धूल का फूल" मधले त्याचे प्रसिद्ध गाणे आठवते ना?

तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हैं, इन्सान बनेगा

साहिर हा मानवतावादी होता. कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नही यावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याने लिहिलेली भजने ऐकली की भारतीय संस्कृती त्याच्या रगारगात भिनली होती हे जाणवते.

अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान

साहिर जाऊन अनेक वर्षे झाली पण अजूनही तो भेटतच असतो.
रहें ना रहें हम, महका करेंगे,
बनके कली, बनके सबाँ, बाग ए वफा में

त्यानेच म्हटल्याप्रमाणे त्याची गाणी मनामनात दरवळत आहेत आणि राहतील. विचारांना दिशा देतील.

------------------------------------