Friday 27 September 2013

मैत्र


संवादासाठी...........
अलिकडे मला वारंवार निदा फाझली यांच्या प्रसिद्ध गझल मधल्या ओळी आठवतात .

कभी किसीको मुकम्मल जहाँ नहीं मिलता
कहीं जमीं तो  कहीं आसमां नहीं मिलता

आयुष्यात पन्नाशीचा टप्पा पार केल्यानंतर, तर या ओळी खूपच उमजतात . तारुण्यात  मनाला येईल ते करून दाखवण्याची उर्मी असते . आणि तस करता येईलच , अशी खात्रीही असते . मात्र जसजसे आपण मोठे होतो,अनुभव येऊ लागतात, तसतसे लक्षात येते, की प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी घडून येत नाही . मुळात आपल्याला जे वाटत तेच बरोबर असत असही नाही . प्रत्येक गोष्टीकडे अनेक दृष्टीकोनातून  पहाता येते. यश , कर्तृत्व , आनंद , सुख याच्या हजारो व्याख्या असू शकतात , आणि त्या वैयक्तिक दृष्टीने खऱ्याही असतात .
वयाने , अनुभवाने मोठे,झाल्यावर मग आणखी एक गरज भासते , ती म्हणजे संवादाची ! आपले अनुभव , भावना दुसय्राला सांगाव्याशा वाटतात . इतरांच्या अनुभवाच्या कसोटीवर त्या खऱ्या उतरतात का हे तपासून पाहावेसे वाटते . इथे पुन्हा निदा फाझली यांच्याच ओळी समोर येतात .
जिसे भी देखिये वो अपने आपमे गुम है
जुबां मिली है मगर हमजुबां नहीं मिलता
अस  वाटले , की किती खऱ्या आहेत या ओळी , विशेषतः आजच्या जमान्यात !

मध्ये पेपरात एक फोटो आला होता. एक फोनवर बोलत होता, एक मेसेज करत होता, एक आपल्या laptop वर काम करत होता, आणि चौथा कानात earphones घालून बहुतेक गाणी ऐकत होता. आज सगळेचजण या चक्रात अडकलेले दिसतात. उत्साहाने कोणाला काही सांगायला गेले तर, हीच स्थिती आढळते. आणखी दुसऱ्याला कशाला काही म्हणायचं? आपण पण कधी कधी असेच वागतो की!
संवादाचे हे तुटलेपण कधी कधी अस्वथ करते. एखादा चांगला लेख वाचला, की कोणाला तरी सांगावसं वाटते. कोणाशीतरी बोलावेसे वाटते. एखादा सिनेमा, एखादं पुस्तक, गाण्याची एखादी ओळ, घडलेला प्रसंग मनात असंख्य विचार घेऊन येतात. हे विचार कोणाला तरी सांगावेसे वाटतात. पण .........
मग मनात विचार आला, की कधी कधी दुरावा आणणारी ही technology माणसांना जोडते देखील !
ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या काही निवडक मित्र-मैत्रिणींशीच नव्हे तर अनेकांशी संवाद साधू शकेन. मनात येणारे विचार अधिक मोकळेपणाने मांडू शकेन.
आणि हाच विचार करून ‘ मैत्र ‘ हा ब्लॉग चालू करायचे ठरवले.
मनातले सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठीही !!!!!!!
******************