Sunday 26 June 2016

मैं कासे कहुं ...........

मैं कासे कहुं ...........

काही काही गाणी मनात घर करून राहतात. हे गाणं असंच !!!!!
माई री, मैं कासे कहुं पीर अपने जियाकी.....................
जिवाची तगमग होतेय, काहीतरी सांगावसं वाटतंय, पण कसं सांगू? अगदी जन्मदात्या आईलाही सांगावं की नाही असा प्रश्न पडतोय!

मला लहानपणापासून हे गाणे अतिशय आवडायचं. सूर मन भारून टाकायचे आणि हुरहूरही वाटायची. गाणे ऐकताना त्यातील आर्तता जाणवायची पण शब्दांचा अर्थ लागला तरीही गाणे पूर्णत्वाने समजले असे वाटायचे नाही.

'दस्तक' या सिनेमातील हे गाणे! मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द, मदन मोहन यांचे अप्रतिम संगीत आणि तेवढाच अप्रतिम लताचा आवाज! हा सिनेमा आला तेव्हा मी शाळेत होते. 'फक्त प्रौढांसाठी' असलेला हा सिनेमा मी पाहण्याचा प्रश्नच नव्हता. रेहाना सुलतान, संजीवकुमार आणि मदनमोहन यांना या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. माझा आणि या सिनेमाचा संबंध यांतील गाण्यांसाठी होता. या चित्रपटातील सर्वच गाणी लाजवाब! पण 'माई री ' हे गाणे मात्र कळूनही मला कळत नव्हतं. याच गाण्यात म्हटल्याप्रमाणे 'पाकर भी नहीं, उनको मैं पाती' असं वाटायला लावणारे!

काही महिन्यांपूर्वी अचानक 'दस्तक' हा सिनेमा दूरदर्शनवर लागला. यांतील गाण्यांसाठी हा सिनेमा पाहायला बसले. मुंबईतील एका भागात संजीवकुमार आणि रेहाना सुलतान हे नवीनच लग्न झालेले जोडपे राहायला येते. ज्या घरात ते राहायला येतात, त्या घरात पूर्वी एक गाणारी बाई राहत असते. (म्हणजे तवायफ किंवा वेश्या). आसपासच्या लोकांना रेहाना पण तशीच आहे असं वाटतं. घरावर सतत कोणीतरी थाप देतं. खिडक्यांतून अनेक डोळे रोखले आहेत असं या जोडप्याला वाटत रहाते. साहजिकच या तरुण जीवांची कुचंबणा होते.गाण्याची आवड असून गायला तिला सक्त मनाई केली जाते.

'ना तडपने की इजाजत है ना फरियाद की है, घुट के मर जाउं, ये मर्जी मेरे सैयाद की है'

असं व्याकुळ होऊन म्हणत, तंबोरा उराशी कवटाळून ती तरुणी रडते. आणि हे गाणे सुरु होते. त्या दोघांची शारीरिक आणि मानसिक कुचंबणा व्यक्त करणारे!!!!

या नवविवाहित दाम्पत्याला एका घरात राहूनही एकमेकांजवळ येता येत नाही. ' पडी नदिया के किनारे मै प्यासी ' असी दोघांची गत झाली आहे. या गाण्यात जोरजोरात वाजणाऱ्या घंटा आणि सुसाट धावत सुटलेली रेहाना हे दृश्य पडद्यावर पाहताना अंगावर काटा येतो. धावत धावत एका कड्याच्या टोकाशी ती येते. परत मागे फिरून समुद्राच्या दिशेने धावत सुटते. शरीराचा हा आवेग तिला सहन होत नाहीये! घुसमटण्याची परिसीमा झाली आहे.

रेहाना सुलतानचे पाण्याने भरलेले डोळे, कासावीस होऊन तिचे तंबोरयाला कवटाळणे, नकळत गाण्याच्या ओळी ओठांवर आल्या आल्या कोणीतरी खालून आवाज करणे आणि भयभीत होऊन तिचे थरथरणे !!
हे सर्व पाहताना या गाण्याचा अर्थ मला कळला. आईलाही सांगू शकता येणार नाही अशी ही घुसमट!
आतापर्यंत मनाला भिडणाऱ्या सुरांतून अर्थही उलगडू लागला.

'ओस नयन की उनके मेरी लगी को बुझाए ना, तन मन भिगो दे आके ऐसी घटा कोई छाए ना,
मोहे बहा ले जाए ऐसी लहर कोई आए ना ,पडी नदिया के किनारे मै प्यासी !!!'

त्याच्या डोळ्यातल्या दवबिंदुंनी माझे समाधान होत नाही, माझ्या तनमनाला कवेत घेईल अशी कोणती लाट येत नाही, सर्वस्व उधळून द्यावे असा क्षण अजूनही येत नाही, ....................

एका स्त्रीच्या अतृप्त लैगिक इच्छेचे इतके अचूक वर्णन आणि तेही कुठेही मर्यादा न सोडता व बीभत्स न वाटता केलेले मी आजपर्यंत पाहिलेले /वाचलेले नाही. एक माणूस म्हणून तिच्याकडे पाहिल्याने ते चूकही वाटत नाही. हातात तंबोरा असून वाजवायचे नाही, गळ्यात सूर असून गायचे नाही आणि प्रियकर जवळ असूनही त्याच्याजवळ जायचे नाही अशी विलक्षण केविलवाणी अवस्था या गाण्यातून व्यक्त होते.

या गाण्याचे शब्द, संगीत, स्वर, अभिनय आणि चित्रीकरण यांचा एकत्रित अनुभव म्हणजे एक विलक्षण अनुभूती आहे. काळाच्या ओघात टिकणारी ती श्रेष्ठ कला असे म्हणतात. हे गाणे म्हणजे अशीच एक कलाकृती आहे.

----------------------------------------------

Wednesday 11 May 2016

साहिर !!!!


पोछ्कर अश्क अपनी आंखोसे, मुस्कुराओ, तो कोई बात बने,
सर झुकानेसे कुछ नहीं होगा, सर उठाओ तो कोई बात बने,

"नया रास्ता" या नावाचा एक सिनेमा ४०/४५ वर्षांपूर्वी आला होता. या सिनेमातील हे गाणे ! अगदी नकळत्या वयात कानांवर पडलेले ! पण त्या वेळीही मनाला भिडलेले !

रंग और भेद जात और मझहब, जो भी हो आदमी से कमतर हैं
इस हकीक़त को तुम भी मेरी तरह मान जाओ तो कोई बात बने,

या गाण्यातून कवीला चांगला संदेश, वेगळा संदेश द्यायचा आहे एवढे मला तेव्हा ही कळले.
गाणे आवडले की लिहून ठेवायची माझ्या आईची सवय होती. सुरुवातीला अनुकरण म्हणून केलेला हा उद्योग मला पुढे खूप समृद्ध करून गेला. अशीच आवडलेली गाणी लिहिता लिहिता, मी त्याखाली कवी, संगीतकार, गायक आणि सिनेमाचे नाव ही लिहू लागले. आणि या आवडलेल्या गाण्यांत साहिरचे नाव वारंवार येऊ लागले. या गीतकाराची जातकुळी वेगळीच आहे हे जाणवू लागले.

"नया रास्ता" मधील या गाण्यातही एका भेदाभेदरहित समाजाची कल्पना कवी करत आहे. वास्तव मान्य करणे महत्वाचे आहे तरच आपण ते बदलू शकतो. हक्क मागून मिळत नसतो, तो कधी कधी हिसकावूनही घ्यावा लागतो. तेवढी हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल असे सांगणारी ही कविता !!!!! विचार करायला लावणारी गाणी ही साहिरची खासियत !

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भ्रमनिरास झालेल्या तरुण वर्गाचे दर्शन त्याच्या "प्यासा" मधील कवितांतून दिसते.
जिन्हे नाझ हैं हिंदपर वो कहां हैं?
ये दुनिया अगर मिल भी जायें तो क्या हैं?

पैशाला पुजणार्या जगात तो एकटा पडतो.
जाने वो कैसे लोग थे, जिनके प्यार को प्यार मिला
असा प्रश्न त्याला पडतो.

साहिर हा साम्यवादी विचारसरणीचा होता. या त्याच्या विचारांचे दर्शन त्याने लिहिलेल्या गाण्यातूनही घडते. "फिर सुबह होगी" या चित्रपटातील त्याचे "वो सुबह कभी तो आयेगी" हे गाणे आठवते ना? नवे जग निश्चित येईल अशी आशा त्याला होती. "नया दौर" या सिनेमातील "साथी हाथ बढाना" हे गाणे नव्या जगाची दिशा दाखवते. त्याचा आशावाद अगदी साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करते.

आशावाद जागवणारा साहिर कधी कधी मात्र नैराश्येच्या गर्तेत जातो.
जाये तो जाये कहाँ, समझेगा कौन यहाँ, दर्दभरे दिल की जुबाँ
असे व्याकुळतेने विचारतो.

अशा निराशावादी साहिरनेच -
आगे भी जानेना तू, पिछे भी जानेना तू, जो भी हैं बस यहीं एक पल हैं
असे आशावादी गीत ही  लिहिले आहे.

रात जितनी भी संगीन होगी, सुबह उतनीही रंगीन होगी - असा धीर ही दिला आहे.

प्यार पर बस तो नहीं हैं मेरा, लेकीन फिर भी,
तू बता दे के तुझे प्यार करूं, या ना करूं,
प्रेयसीला विचारून, तिच्यावर प्रेम करणारा हा कोमल हृदयाचा प्रियकर ! आजच्या काळात मैत्रिणीने 'नाही' म्हटल्यावर तिला भोसकणारा, तिचा खून करणारा प्रियकर - या पार्श्वभूमीवर साहिरचे हे हळवेपण उठून दिसते.

काही गाण्यांत त्याची मते इतक्या परखडपणे व्यक्त होतात की अंगावर काटा येतो. "साधना" सिनेमातले "औरत ने जनम दिया मर्दों को" हे असेच एक गाणे ! समाजाचे किळसवाणे रूप कठोरपणे साहिर समाजासमोर आणतो.
मर्दों ने बनाई जो रस्में, उनको हक़ का फर्मान कहा,
औरत के जिंदा जलने को, क़ुर्बानी और बलिदान कहा,
इस्मत के बदले रोटी दी, और उसको भी एहसान कहा
ये वो बदकिस्मत माँ हैं जो, बेटों की सेज पे सोती हैं

पुरुषांनाच काय पण स्त्रियांनाही त्यांच्या जगण्याची जाणीव करून देणारे हे काव्य !

ही कविता मी ऐकली आणि अंतर्बाह्य हादरून गेले. एका पुरुषाने जाणलेले स्त्रियांचे दुःख, त्यांच्या अस्तित्वाची वेदना याहून प्रखरपणे व्यक्त होऊच शकत नाही.

साहिर हा अशा अनेक रुपांत भेटत रहातो. मलाच काय पण अनेकांना आयुष्य समजावत रहातो. धर्माविषयीही त्याची परखड मते होती. "धूल का फूल" मधले त्याचे प्रसिद्ध गाणे आठवते ना?

तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद हैं, इन्सान बनेगा

साहिर हा मानवतावादी होता. कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नही यावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याने लिहिलेली भजने ऐकली की भारतीय संस्कृती त्याच्या रगारगात भिनली होती हे जाणवते.

अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान

साहिर जाऊन अनेक वर्षे झाली पण अजूनही तो भेटतच असतो.
रहें ना रहें हम, महका करेंगे,
बनके कली, बनके सबाँ, बाग ए वफा में

त्यानेच म्हटल्याप्रमाणे त्याची गाणी मनामनात दरवळत आहेत आणि राहतील. विचारांना दिशा देतील.

------------------------------------