Tuesday 12 November 2013

करवा चौथ

करवा चौथ

“करवा चौथ’’ हा सण नुकताच मोठ्या आनंदात साजरा केला गेला. खरं तर, हा सण नाही. पण यश चोप्रा, करण जोहर आणि तमाम टी.व्ही. channels च्या कृपेने हा एक सण बनला आहे.परवा एका छोटयाशा city news नावाच्या पत्रिकेतही एका दाक्षिणात्य मुलीने आपण “करवा चौथ” हा कसा साग्रसंगीत साजरा केला हे सांगितले होते. हे सगळे वाचून, पाहून मनात अनेक विचार येतात.

आपल्या संस्कृतीत अनेक सण आहेत आणि अनेक रीतीभाती! जे सण म्हणून आपण साजरे करतो त्याचा संबंध आहे आपल्या शेतीप्रधान जीवनप्रणालीशी! उदा: दिवाळी. पावसाळ्यानंतर धन-धान्य घरात आल्यानंतरचा हा सण. या वेळी आपण आनंद साजरा करतो, दिवे लावतो, लक्ष्मीची म्हणजेच धान्याची पूजा करतो. यावेळी ऋतूही बदलतो. जाणाऱ्या ऋतूला प्रेमाने निरोप आणि येणाऱ्या ऋतूचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे चैत्री पाडवा, संक्रांत हे ही ऋतुबदलाचे स्वागत करतात. काही सण आभार मानण्यासाठीही साजरे केले जातात. जसे पोळा हा सण खास बैलांचे आभार मानण्यासाठी शेतकरी साजरा करतो.

मात्र स्त्रियांचे सण? हळदी-कुंकू, मंगळागौर, करवा चौथ, वट पौर्णिमा, हरतालिका, श्रावणी सोमवार, शुक्रवारची सव्वाष्ण, रक्षा बंधन, भाऊबीज ................हे खरं तर सण नाहीत तर रीती-रिवाज आहेत. या सगळ्या रीतींचा कुणी गंभीरपणे विचार केला आहे का? यातील सगळे सण विवाहित महिलांचे आहेत. यातील अनेक रीती या लग्नानंतर सुरु होतात. सगळ्या रीतींचा उद्देश हा एकच! नवऱ्याची भरभराट व्हावी, त्याला आरोग्य लाभावे, त्याला उदंड आयुष्य मिळावे. हरतालिकेचा उपास करायचा तोही चांगला नवरा मिळावा म्हणून! मुलांसाठीचे उपास ही बायकांनीच करायचे. या रीतीत बायकांनी उपास करायचा, मग नवऱ्याला, भावाला ओवाळायचे. त्यांच्या पाया पडायचे अशा प्रथा आहेत.

कोणी बनवल्या या रीती? हे उपास-तापास? लग्नानंतर सुरु होणाऱ्या या रीतीतून स्त्रियांच्या मनावर हे बिम्बवण्यात येते की नवरा/भाऊ/मुलगा/वडील महत्वाचे! थोडक्यात काय तर पुरुष महत्वाचा. त्याचे आरोग्य, आयुष्य महत्वाचे! भावाला, नवऱ्याला ओवाळणे, भावाने भेट देणे – या सगळ्यात ‘देणारा’ हा पुरुष आहे आणि ‘स्वीकारणारी’ स्त्री आहे. या रीती-भातीतून पुरुष प्रधान संस्कृतीची वारंवार ‘reinforcement’ केली जाते. त्याला मग नटण्या-मुरडण्याचे गोंडस रूप दिले जाते. नव्या कोऱ्या साड्या दिल्या जातात. मात्र हे वरचे रूप आहे हे आपणच ओळखायला हवे. आजही लग्नानंतर मुलीकडून नावापासून ते आवडीनिवडीपर्यंत सगळे बदलण्याचा अट्टाहास केला जातो.

अनेक ठिकाणी स्त्री कर्तबगार असली तरीही केवळ पुरुष म्हणून नवऱ्याचा किंवा भावाचा मान केला जातो. त्याचा मान जपला जातो. आजही जगात जवळ-जवळ सगळ्या ठिकाणी कायदे बनवणारे पुरुषच आहेत. मग ती धर्मसत्ता असो वा राजसत्ता! त्यामुळे जगभरात आजही प्रत्येक कायद्यात, प्रत्येक नियमात पुरुषाला झुकतं माप आहे. बायकांनी कोणते कपडे घालावे यापासून ते तिने कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या नाही या प्रत्येक बाबतीतले नियम पुरुषांनी बनवलेले आहेत. त्यामुळेच आज २१ व्या शतकातही गर्भपात करता न आल्यामुळे सविता हलाप्पानवर सारख्या डॉ. बाईलाही आपला जीव गमवावा लागला. थोडक्यात ही स्थिती सर्व धर्मात आहे. हिंदू असो वा ख्रिश्चन वा मुसलमान, सर्व धर्मात नियम बनविण्याचा मक्ता हा पुरुषांचाच आहे. या ठिकाणी ते स्त्रियांना घुसुही देत नाहीत.

त्यामुळेच आपण साऱ्या महिलांनी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. “न स्त्री स्वातंत्र्य अर्हति” असे म्हणणारा मनु पुराणात होता हे खोटे आहे. आजही तो जिवंत आहे, पुरुषांच्या मानसिकतेतही आणि रुढींचे आंधळे अनुकरण करणाऱ्या, पुरुषांना श्रेष्ठ मानणाऱ्या स्त्रियांच्या मनातही!


जगातील निम्मी लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. आपणच आता ठरवायचे की स्वतःच्या हक्कासाठी लढायचे की “scheduled caste” म्हणून पितृसत्ताक पद्धतीत स्वतःचेच शोषण होऊ द्यायचे.