Sunday, 17 November 2024

केल्याने देशाटन – जैसलमेर

 


जैसलमेर

जैसलमेर स्टेशनला पोचलो, तर तिथेही स्टेशनचे काम चालू होते. “रेल्वेने ४०० कोटी रुपये स्टेशनच्या नूतनीकरणासाठी दिले आहेत”, असे आमचा ड्रायव्हर आम्हाला अभिमानाने सांगत होता. “तुम्ही पुढच्या वेळी याल नां, तेव्हा स्टेशन अगदी नावे असेल बघा...”

पर्यटनाच्या दृष्टीने जैसलमेर हे राजस्थानातील महत्वाचे शहर आहे. या शहराची लोकसंख्या खूप नाही. थरच्या मरुभूमीत वसलेले हे शहर राज्याच्या एका टोकाला आहे. जैसलमेर हे शहर येथील किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. येथील किल्ला हा जगातील एकमेव living fort आहे. मराठीत आपण त्याला ‘नांदता किल्ला असेही म्हणू शकतो. हा किल्ला जवळजवळ १००० वर्षांपूर्वी बांधला गेला. जैसलमेर येथील राजांना ‘रावल अशी उपाधी आहे. 

जैसलमेर फोर्ट रात्रीच्या वेळी

येथील राजे मूळचे कृष्णाच्या यादव वंशातले होते असे आमच्या गाईडने सांगितले. पहिला राजा जैसल याने हा किल्ला बांधला म्हणून हा किल्ला जैसलमेर या नावाने ओळखला जातो. किल्ल्यातील महालात गेल्या चार-पाच हजार वर्षांपासूनच्या राजांच्या नावांची यादी आहे. हा इतिहास नीट जतन केलेला पाहून आश्चर्य वाटले. या किल्ल्यात सध्याही जवळजवळ चार-पाच हजार लोकं राहतात. यातील काही जुन्या घरांचे छोट्या छोट्या हॉटेलात रुपांतर केले आहे. ही घरे हवेल्यांसारखीच आहेत. त्यामुळे पर्यटकांना ती आवडतातच.

आधीच्या जवळ  जवळ १५० राजांच्या नावांची यादी  

किल्ल्यात राजाचा महालही आहे. अगदी आत्तापर्यंत राजेही याच ठिकाणी राहत होते. पण सध्या राजे मंदिर हवेली या ठिकाणी राहतात. किल्ल्यात दसरा चौक आहे. अजूनही दर दसऱ्याला राजे इथे येतात आणि दसरा साजरा करतात. राजांचा महाल अगदी सुस्थितीत आहे आणि तिथले गाईड तो अतिशय आत्मीयतेने दाखवतात. पूर्वी जैसलमेरचे सर्व रहिवासी किल्ल्यातच राहायचे. ब्राह्मण, व्यापारी असा हा वर्ग होता. जैन लोकांनी राजाला विनंती करून आम्हालाही येथे राहायची परवानगी द्या असे सांगितले. त्यामुळे येथे सात जैन मंदिरेही आहेत. पार्श्वनाथ जैन मंदिर त्यातील नाजूक कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. जैन मंदिरांसोबत विष्णू, लक्ष्मी व कालीमाता मंदिरेही येथे आहेत. ही माहिती तुम्हांला इंटरनेट/महाजालावर अधिक विस्ताराने मिळेलच.

पार्श्वनाथ जैन मंदिर, नाजूक कलाकुसर केलेले खांब

मी माझ्या लक्षात आलेल्या काही गोष्टी सांगते. किल्ला पाहत असताना माझ्या लक्षात आले की अनेक बंगाली भाषिक पर्यटकही आमच्या सोबत किल्ला पाहत आहेत. आम्ही दिवाळीच्या आधी गेलो होतो म्हणून मला वाटले, की हे बंगाली लोक दुर्गापूजेच्या सुट्टीत येथे आले असावेत. पण तरीही उत्सुकता वाटली, कारण बंगाल आणि राजस्थान ही भारताची दोन टोके आहेत. त्यातही जैसलमेर हे राजस्थानच्या टोकाला आहे. याचा उलगडा आमच्या गाईडने केला. तो म्हणाला, “सत्यजित रे स्वतःच लिहिलेल्या “शोनार केल्ला” ह्या कादंबरीवर ह्याच नावाचा सिनेमाही बनवलेला आहे. बंगाली लोकांचे सत्यजित प्रेम सांगायलाच नको, त्यामुळे प्रत्येक बंगाली माणसाने हा सिनेमा पहिला आहे. त्यामुळे अनेक बंगाली लोक जैसलमेर म्हणजे सोन्याचा किल्ला पाहायला आजही येतात. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात हा किल्ला दिसतो ही खरोखरच सोन्यासारखा!!! साहित्य, सिनेमा ह्या कलांचा आपल्या मनावर किती खोलवर प्रभाव पडतो हे जाणवले.

अजून एक गम्मत झाली. सकाळी बाहेर पडलो, तर किल्ल्यातील दसरा चौकात मराठी मुलांची गजबज दिसली. आम्ही विचारलं तर समजलं की मिरजेतील एका शाळेची ट्रीप आली आहे. मुलांच्या शिक्षिका आनंदाने म्हणाल्या, “अहो, आता मिरज-जयपूर अशी ट्रेन आहे ना, त्यामुळे आम्ही मुलांना इथे घेऊन आलो आहोत.” नेहमी राजा साजरा करतो त्याच दसरा चौकात मुलांचे मजेत फोटो काढणे चालू होते. लहान वयात केलेल्या अशा पर्यटनाने निश्चितच मनाची कवाडे उघडायला मदत होते.

जैसलमेर किल्ला पाहत असताना एका घराच्या बाहेरच्या भिंतीवर एक आमंत्रण पत्रिका दिसली. घराच्या भिंतीवर आमंत्रण पत्रिका का बरं रंगवली असेल? या प्रश्नावर गाईड म्हणाला, “ही इथली खास पद्धत आहे. पूर्वी किल्ल्यात राहणारे लोक ब्राह्मण किंवा क्षत्रिय असायचे. ह्या दोन्हीही जमाती व्यापार किंवा शेतीच्या कामांत गुंतलेल्या असायच्या. लग्न-मुंज अशा शुभकार्याचे मुहूर्त आपल्या पंचांगाप्रमाणे साधारण एकाच काळात यायचे. मग अशा वेळी सगळ्यांच्या घरी जाऊन आमंत्रण देण्याऐवजी अशी घराबाहेर आमंत्रण पत्रिका रंगवली जायची. लोकंही अनमान न करता आवर्जून एकमेकांच्या घरी शुभकार्याला जात असत.”

सर्वांना आग्रहाचे आमंत्रण 

जैसलमेर हे तसे लहान शहर असले तरीही ह्या ठिकाणी मारवाडी समाज मोठ्या प्रमाणात राहत होता. ह्या वाळवंटातून मोठ्या प्रमाणात व्यापार व्हायचा पूर्वीच्या काळी. त्यामुळे मारवाड्यांच्या सुंदर हवेल्या आहेत ह्या शहरात. या हवेल्यांना तळघर ही असायचेच. व्यापारी असलेल्या मारवाड्यांना माल ठेवायला ह्या तळघरांचा उपयोग व्हायचा. ‘पटवोंकी हवेली’, ‘नाथमल की हवेली’, ‘सालेम सिंग की हवेली’ अशा देखण्या हवेल्या आवर्जून बघण्यासारख्या आहेत. १९व्या शतकात ह्या हवेल्यांचे बांधकाम झाले आहे. या हवेल्या किल्ल्याबाहेर आहेत. इथले मारवाडी थोड्या प्रमाणात अफुचाही व्यापार करत असत. लग्नकार्यात अफुसेवनासाठीही एक दिवस असे, अशी ही माहिती आमच्या गाईडने दिली. ब्रिटिशांनी कलकत्ता आणि मुंबई ही बंदरे विकसित केल्यावर ह्या मार्गावरून होणारा व्यापार बंद झाला.

पटवों की हवेली


जैसलमेर मध्ये मंदिर हवेली, गडीसर तलाव आणि बडा बाग ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. गडीसर तलाव हा पावसाचे पाणी साठवण्याकरिता बांधून काढलेला तलाव आहे. ‘सरफरोश ‘ सिनेमात गडीसर तलाव, मंदिर हवेली व जैसलमेर शहराचे चित्रण आहे. बडा बाग ही जागा बघण्यासारखी आहे. जैत सिंग यांनी सोळाव्या शतकात या ठिकाणी एक बांध बांधला. त्यामुळे ह्या वाळवंटी प्रदेशात ह्या बांधाच्या आसपास हिरवळ फुलली. जैत सिंग यांच्या मुलाने आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ इथे एक बाग वसवली व छत्री बांधली. त्यानंतर अनेक राजांनी आपल्या पूर्वजांच्या सन्मानार्थ इथे स्मारके बांधली. इथून सूर्यास्त जरूर बघावा.

‘कुलधरा’ हे एक विलक्षण गांव जैसलमेर जवळ आहे. हे गाव तेराव्या शतकात वसवले गेले होते. ह्या गावात पालीवाल ब्राह्मण समाजाचे लोक रहात असत. ह्या गावाच्या संदर्भात अनेक कथा आहेत. आज ह्या गावात कोणीही रहात नाही. १९ व्या शतकात ह्या गावातील सर्व रहिवासी हे गाव सोडून निघून गेले. इथल्या विहिरी आटल्यामुळे रहिवासी गाव सोडून गेले असा एक समज आहे. दुसरी कथा अशी की, सलीम सिंग ह्या कारभाऱ्याच्या छळामुळे, अत्त्याचारामुळे लोकांनी हे गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला असावा. माझ्या मते पाण्याची कमतरता हे कारण असावे. या गावातील काही घरे, एक चौक, एक मंदिर जतन करून ठेवले आहे. बाकी गाव दगडांच्या राशी असल्यासारखा आहे. संध्याकाळी सहानंतर या ठिकाणी कोणीही येत नाही. काळाच्या ओघात एका नांदत्या गावाचे ओसाड गाव झाले आहे. पण येथील अनेक दंतकथांनी त्याला जिवंतही ठेवले आहे.

कुलधरा
ओसाड गांव

जैसलमेर हे शहर हे मरुभूमीतच असल्याने येथील वाळूतील सफरीसाठी पर्यटक जातातच. याठिकाणी एक रात्र राहण्याचीही सोय असते. दुपारी जैसलमेरहून निघून साधारण ३/४ वाजता आम्ही SAM Sand Dunes ला पोचलो. संध्याकाळभर वाळूत उंटावर, जीपवर बसून सगळे धमाल करतात. वाळूच्या उंच-सखल टेकड्यांवरून जीपने जाण्याची मजा औरच आहे. इथे सर्वजण सूर्यास्ताचा अद्भुत अनुभवही घेतात. सागरतीराप्रमाणेच मरुभूमीतील सूर्यास्तही वेगळाच अनुभव देऊन जातो. रात्री कॅम्पवर राजस्थानी नृत्ये, संगीत यांचा कार्यक्रम असतो. जेवण असते. रात्री तिथे राहून सकाळी सगळे परत जैसलमेरला येतात.

SAM sand dunes 

आमच्यासोबत यावेळी हरयाणातील हिस्सार शहरातील शाळेतील मुलं-मुली ट्रीप करिता आली होती. मुलांची गजबज-गडबड पाहून मस्त वाटत होते. ही मुले सकाळी उठून त्यांच्या बसने तनोट माता मंदिर व भारत-पाकिस्तान सीमा पाहणार होते. ‘Border’ सिनेमा आठवतोय ना? तिथले बरेचसे शूटिंग ह्याच भागात केले आहे.

आपला देश किती विशाल आहे, त्यात किती वैविध्य आहे हे अशा ठिकाणी गेल्यावर जाणवते. मरुभूमीत दिमाखाने उभा असलेला हा नांदता, ‘सोनेरी किल्ला’ पाहण्यासाठी जैसलमेरला एकदा जरूर भेट द्या.

स्नेहा केतकर

7 comments:

  1. मीना अगदी प्रत्यक्ष ते वाळवंट, सोनेरी किल्ला पाहिल्याचा अनुभव मिळाला ,👍👍
    सुजाता जोग

    ReplyDelete
  2. जेसलमेर किल्यात बर्याच घरांवर वर-वधूची नांवे आणि लग्नाची तारीख लिहिलेली दिसतात. त्याबद्दल मला असे सांगण्यात आले होते कि जेंव्हा त्या परिवारातील आणखीन एका व्यक्तीचे लग्न होउ घालते, तेंव्हा घराला रंग दिला जातो आणि भावी वर-वधूंचे नांव लिहीले जाते.

    ReplyDelete
  3. खूप छान

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती! स्नेहा. खरंच आपल्या देशात कित्ती पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. जैसलमेर माझ्या लिस्ट मध्ये add झालं.

    ReplyDelete
  5. फार छान माहिती।

    ReplyDelete

Share your views also ---