मुखवटे आणि चेहरे
ऑगस्ट २०२४ हा महिना अनेक कारणांनी गाजला. आणि गाजतोय. ९ ऑगस्ट २०२४ या दिवशी कलकत्त्यातील राधा गोबिंद कार या सरकारी इस्पितळातील एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ३६ तासांची ड्युटी करून, विश्राम करत असलेल्या या डॉक्टर सोबत हा अघोरी प्रकार घडला. गेले वीस दिवस वर्तमानपत्रात, टीव्हीवर यावर चर्चा चालू आहेत. महाराष्ट्र आणि देशातील इतर भागांतही अशा प्रकारे झालेल्या लैंगिक अत्याचारांबद्दल जनमानसांत राग आहे. त्याच्याही बातम्या आपण पाहिल्या. या संदर्भातही ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
मात्र आज वीस दिवस उलटून गेले तरी प.बंगालमधील निदर्शने, मोर्चे थांबण्याचे चिन्ह नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तेथील जनता चिडलेली आहे. एका सरकारी इस्पितळात, स्त्री मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री असताना तिथे असा प्रकार घडावा? या ठिकाणी महिला डॉक्टरना विश्रांतीसाठी वेगळी खोली नसावी? एखादा Pandora’s Box उघडावा तशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेस सत्तेत येऊन आता तेरा वर्षे झाली आहेत. हे सरकारी इस्पितळ आहे. इथे अशा प्रकारची अव्यवस्था, अनागोंदी कारभार कसा आहे? हा प्रश्न जनतेला पडला आहे. त्यात इतरही अनेक गोष्टीबद्दल संताप आहे. सरकारने संदीप घोष यांची घाईघाईने बदली का केली? कुंपणाने शेत खाल्ले तसे, पोलीस म्हणून ड्युटी करणाऱ्या इसमानेच हे दुष्कृत्य केले. मग त्याला आजपर्यंत ह्या ठिकाणी राजरोसपणे कसे येऊ दिले जात होते? असे अनेक प्रश्न जनतेला पडले आहेत.
ममता बॅनर्जी ह्या जन आंदोलनातून पुढे आलेल्या नेत्या आहेत. लोकांची नस ओळखणाऱ्या नेत्या असा त्यांचा लौकिक आहे. एक प्रभावी महिला मुख्यमंत्री असूनही त्यांच्या राज्यात स्त्रियाच सुरक्षित नाहीत हा एक संदेश या घटनेनंतर सामान्य नागरिकांत गेला आहे. या प्रकरणात ममता बॅनर्जी यांनी कितीही आकांत तांडव केले, अगदी विरोधी पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, सीबीआय – यांच्याकडे बोट दाखवले तरीही त्या स्वतःवरची जबाबदारी झटकू शकत नाहीत. नव्हे त्यांना ती झटकता येणारच नाही.
जन आंदोलनातून समोर आलेल्या ममतांना, आज प्रथमच स्वतःला प्रचंड लोकक्षोभाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना याची सवय तर नाहीच, पण स्वतःची चूक मान्य करण्याइतके मनोबलही त्यांच्याकडे आहे असे दिसत नाही. ममता बॅनर्जी /तृणमूल काँग्रेस यांच्या मुखवट्यामागचा चेहरा सामान्य जनतेपुढे आला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे.
असाच तडा कलकत्त्याहून दूर असलेल्या केरळ राज्यातील जनतेच्या विश्वासालाही गेला आहे. मल्याळी सिनेसृष्टीतील लैंगिक शोषणाबद्दल जस्टीस हेमा यांनी दिलेल्या अहवालामुळे केरळमध्ये जणू भूकंप आला आहे. यातही हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न झाला असे दिसते. २०१९ साली दिलेल्या या अहवालाबाबत २०२४ पर्यंत केरळ सरकारने काय केले, हा मुख्य प्रश्न आहे. या अहवाला अंतर्गत AMMA - Association of Malayalam Movie Artistes मधील पदाधिकाऱ्यांकडे संशयाची सुई वळते. Casting couch, लैंगिक शोषण, स्त्रियांना धमकावणे – अशा बाबींचा उल्लेख त्यात आहे. १७ महिला कलाकारांनी आपल्या मुलाखतीत याची कबुली दिली आहे. सध्या अनेक you tube वरील वा टीव्ही वरील चर्चेतूनही अनेक जणी पुढे येऊन हे सर्व सत्य असल्याचे सांगत आहेत. AMMA च्या कार्यकारी समितीने राजीनामा दिला आहे. प्रसिद्ध मल्याळी अभिनेते मोहनलाल यांनी ‘आपण कोणत्याही power group चा भाग नाही‘ असे स्वतःपुरते स्पष्टीकरण दिले आहे.
देशाच्या दोन टोकांना घडणाऱ्या या दोन घटनांचे विश्लेषण करताना, मला जाणवणारे साम्य म्हणजे, या दोन्ही घटनांत मुखवटा फाडून मागचा विद्रूप चेहरा जनतेसमोर आला आहे.
‘मां, माटी, मानुष’ अशी घोषणा देऊन, आणि प.बंगाल मधील जुलुमी communist राजवटीला बाजूला सारत, कल्याणकारी राज्य करण्याचे वचन देत तृणमूल काँग्रेस सत्तेवर आली. लागोपाठ तीन वेळा निवडून आल्यावर ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला. आता ह्याला आत्मविश्वास म्हणायचे की उद्दामपणा हे मी वाचकांवर सोपवते. गेल्या काही वर्षात त्यांच्या पक्षाविरुद्ध अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली. निवडणूक जिंकल्यावरही जे दंगे झाले, त्याचेही त्यांनी समर्थन केले. अनेक बाबतीत मनमानी कारभार, केंद्राशी वैर, सीबीआयच्या अधिकाऱ्यांना मारहाण अशा अनेक गोष्टी त्या बिनदिक्कतपणे करत राहिल्या कारण लोकांचा त्यांना पाठिंबा होता.
जनतेचा विश्वास हा राजकारणात अतिशय महत्त्वाचा असतो. तो कमवावा लागतो आणि तसाच प्रयत्न करून टिकवावाही लागतो. सूज्ञ राजकारणी लोकांची साथ कधीही गृहीत धरत नाही. ममता बॅनर्जी यांनी ती चूक केली आहे. आपण काहीही केले तरीही लोक आपल्यावरच विश्वास ठेवतील असे त्यांना व त्यांच्या नेत्यांना वाटत होते. ममता बॅनर्जीना आता ह्या कारभाराचे खापर कोणाच्याही माथी मारता येणार नाही.
केरळातही असेच झाले. कम्युनिस्ट सरकार हे लोककल्याणकारी असते. Liberal असते, स्त्री-पुरुष समानता यांची पाठराखण करते असे आदर्शवादी विचार मनात ठेवून निवडलेले हे सरकार ....याचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. त्याचप्रमाणे मल्याळम सिनेमा भारतातच नव्हे, तर जागतिक पटलावरही प्रागतिक मानला गेला आहे. वेगळे विषय, कलात्मक हाताळणी, दर्जेदार अभिनय व जागतिक दर्जाचे तंत्रज्ञ हा मल्याळम सिनेमाचा चेहरा आहे. केरळातील साक्षरता, स्त्री-पुरुष समानता ही गृहीतच धरली गेली आजपर्यंत. या वातावरणात काम करणाऱ्या स्त्रियांना, सिनेसृष्टीत अशा प्रकारच्या लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागतेय, हे वाचून सामान्य मल्याळी जनता हादरून गेली आहे.
आज प.बंगाल व केरळ येथील जनतेसमोर मुखवट्यामागचे भेसूर चेहरे समोर आले आहेत. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तो तोडला ही भावना ह्या जनतेच्या मनात आहे. आता मल्याळी सुपर स्टार मोहनलाल असो वा राजकारणातील स्टार ममता असो .......जनतेच्या प्रश्नांना त्यांना सामोरे जावेच लागेल.
स्नेहा केतकर
अत्यंत मार्मिक विवेचन आहे.
ReplyDeleteVery correctly written . It is really shameful and painful to see such incidents in a country where we call river as Mata .😡😡
ReplyDeleteउत्तम विश्लेषण
ReplyDeleteविश्वभर जन आंदोलनातून वर आलेले नेते उत्तम प्रशासक नाही होउ शकले. त्याचे कारण विरोधकांच्या भूमिकेतून बाहेर न पडण्याच्या त्यांच्या अपयशास आहे.
ReplyDeleteपूर्णपणे सहमत.
ReplyDeleteहे आता आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे जात चालले आहे.ह्यासाठी न्याय झालाच पाहिजे.
ReplyDeleteखर आहे. पण जनता ही म्हणावी तशी सुजाण नाही.. majority of the voters vote to protect their petty interest and have no concern about character, capability, ideology or performance
ReplyDelete